Wednesday 24 August 2011

बाळासाहेब ठाकरे यांचे अण्णा हजारे यांना पत्र

प्रिय अण्णा यांसी,


जय महाराष्ट्र !


एका विशेष नात्याने ही पत्रवजा विनंती आपणास करीत आहे. राजकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. समज आणि गैरसमजाच्या वावटळी उठत असतात. तुम्ही काय आणि आम्ही काय... त्यातून सुटलेलो नाही. काही असले तरी आपल्या सामाजिक व जलसंधारणविषयक कामाविषयी आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे.

सध्या आपण दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचाराच्या रावणाविरूद्ध जबरदस्त युद्ध पुकारले आहे. रामलीला मैदान म्हणजे भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे कुरूक्षेत्र बनले आहे. उपोषणाच्या मार्गाने छेडलेल्या युद्धास देशभरातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. जनजागृतीची एक लाटच उसळली असून, वातावरण अण्णामय झाले आहे.

आपल्या उपोषणाचा आठवा दिवस सुरू झाला आहे व आपली प्रकृती खालावल्याच्या बातमीने आम्हाला चिंता वाटू लागली आहे. एका महान कार्यासाठी आपण प्राण पणास लावण्याची घोषणा केली आहे, पण ही लढाई आपल्या प्राणावर बेतू नये व ज्यांच्या विरोधात आपण युद्धाला उतरलात त्या दुश्मनांचे त्यात फावू नये यासाठी आम्ही ही कळकळीची नम्र विनंती करत आहोत. आपल्या उपोषणाने देश जागा झालाच आहे व सरकारही हलले आहे. तेव्हा आता ढासळत्या प्रकृतीक़डे पाहून उपोषण सोडा ! उपोषण सोडले तरी आंदोलन सुरूच राहील. आपल्या उपोषण समाप्तीनंतर आपले सहकारी केजरीवाल, बेदी, सिसोदिया वगैरे मंडळींना उपोषणास बसू द्या व आंदोलन चालू राहू द्या.

देशात राजकीय स्वैराचार आणि भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे व सामान्य जनता त्रस्त आहे. आपणांस आठवत असेलच, ४ ऑक्टोबर १९९६ रोजी आपण मला मातोश्री या निवासस्थानी भेटलात. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आपल्या दोघांत चर्चाही झाली. तेव्हाही सर्व थरांत व्यापून राहिलेला भ्रष्टाचार मोडून काढण्याचे वचन मी आपणास दिले होते आणि आपणही त्यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाला होतात की, शिवसेनाप्रमुख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी भ्रष्टाचार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही. आम्ही समन्वयाने एकत्र काम करू. मग यश निश्तितच ! असा विश्वासही आपण तेव्हा व्यक्त केला होता, पण दुर्दैवाने त्याचदरम्यान आमच्यावर काही कौटुंबिक आपत्ती कोसळल्या व आपल्यातला संपर्क तुटला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत व तुमचाही लढा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हेसुद्धा एक महान योद्धेच होते. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना दिलेला एक मंत्र असा की धुरेने युद्धासी जाणे, ही तो नव्हे राजकारणे. हा मंत्र सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. शेवटी पुन्हा एकदा आपणांस महाराष्ट्राच्या नात्याने विनंती करतो आहे की, उपोषण आपण थांबवावे, मात्र लढा सुरूच ठेवावा. आपल्या आंदोलनाचा व या लढ्याचा राजकीय फायदा-तोटा काय हे हिशेब आम्ही करत नाही व आमचा तो स्वभाव नाही. पुढील लढ्यासाठी आपले प्राण महत्त्वाचे. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो, हीच प्रार्थना !

जय हिंद ! जय महाराष्ट्र ! वंदे मातरम !

आपला नम्र

(बाळ ठाकरे)

शिवसेनाप्रमुख

 

No comments:

Post a Comment